टी-20 वर्ल्ड कप: भारतीय महिला संघाची हॅटट्रिक न्यूझीलंडवर मिळवला विजय!
मेलबर्न

 आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. गुरूवारी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताने 4 धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने याआधी ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांचा पराभव केला होता. या विजयासह भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडला विजयासाठी 134 धावांचे आव्हान दिले होते. पण त्यांना 20 षटकात 129 धावा करता आल्या.
त्याआधी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरूवात फार समाधानकारक झाली नाही. स्मृती मानधना पुन्हा एकदा धावा करण्यात अपयशी ठरली. ती 11 धावांवर बाद झाली. त्यानंतर शफाली शर्मा आणि तानिया भाटिया यांनी दुसर्‍या विकेटसाठी 51 धावांची अर्धशतकी भागिदारी केली. तानिला 23 धावांवर बाद करत रोझमेरी मेयरने भारताला दुसरा धक्का दिला. त्या पाठोपाठ कर्णधार हरमनप्रीत कौर 1 धाव करून माघारी परतली.
भारताच्या विकेट एका बाजूने पडत असताना शफालीने दुसरी बाजू लावून धरली होती. शफाली अर्धशतक करेल असे वाटत असताना अमेलिया केरने तिला 46 धावांवर बाद केले. शफाली बाद झाली तेव्हा भारताची अवस्था 13.5 षटकात 5 बाद 95 अशी होती. त्यानंतर 20 षटकात भारताला 8 बाद 133 धावांपर्यंत मजल मारता आली.